Friday, February 12, 2021

रांजणगिरी किल्ला

त्रंबकेश्वर डोंगररांग म्हणजे निसर्ग सौंदर्याचा निखळ झराच समजा की, इतके छान छान किल्ले आणि विलोभनीय दृश्याने भरलेला हा परिसर आपल्याला प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. याच डोंगररांगेत आहे एक अजबच आकाराचा हा किल्ला “किल्ले रांजणगिरी”.

★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

१) पोहचाल कसे?
नाशिकपासून 15किलोमीटर इगतपुरी कडे जाताना मुळेगाव लागते हेच रांजणगिरी च्या पायथ्याशी असणारे गाव आहे.

२) किल्ल्याची उंची:- 2790 फूट 

3) किल्ल्याची श्रेणी:- मध्यम  

४) डोंगररांग:- त्र्यंबकेश्वर

५) इतिहास:- 
त्या काळी एक मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक प्रसिद्ध होते. डहाणू बंदरात उतरणारा सर्व माल गोंडाघाट-अंबोली घाट मार्गे नाशिकला येत असे. याच व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, भास्करगड , हरिहर , रांजनगीरी ह्या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.

६) किल्ल्यावर काय काय पाहणार?
गडावर पोहचताना आधी रांजण सारख्या आकाराच्या सुळक्याला वळसा घालून जावं लागतं ह्याचा रंजनासारखा आकार गडमाथ्यावर गेल्यावर स्पष्ट दिसतो. गडमाथ्यावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. गडमाथ्यावरन पूर्वेला वैतरणा धरणाचा जलाशय, गडगडा किल्ला, दक्षिणेला  डांग्या सुळका आणि मोठा परिसर नजरेस पडतो.

★महत्वाची टीप:- 
रांजनासारखा आकार असलेला सुळका थोडासा काळजीपूर्वक चढावा कारण वाट ही निसरडी आहे.

★छायाचित्रे:-


★पूर्ण माहितीपट आपल्या Youtube चॅनेलवर उपलब्ध आहे नक्की पहा...
पुढे क्लिक करा..

Wednesday, February 10, 2021

किल्ले वाघेरा

बहुतेक किल्ल्यांची नावे ही त्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांवरून ठेवली जात अशाच प्रकारे वाघेरा ह्या पायथ्याशी असलेल्या गावावरून ह्या किल्ल्याच नाव वाघेरा ठेवण्यात आलं. नाशिक मधील अपरिचित असलेल्या अनेक किल्ल्यांसारखाच ह्या किल्ल्याचा ही शोध घेत घेत मी इथे आलो.

★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

१) पोहचाल कसे?
नाशिकपासून वायव्येला हरसूल मार्गावर ३५ किलोमीटर अंतरावर वाघेरा हे गाव आहे. ह्या वाघेरा गावपासून त१ किलोमीटर आत गेलात की राजविहिरवाडी नावाच पाड आहे. इथूनच आपण वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला येतो.

२) किल्ल्याची उंची:- समुद्ररसपाटीपासून ३४४४ फूट 

३) किल्ल्याची श्रेणी :- मध्यम 

४)डोंगररांग:- पेेेठ सुुरगाणा

५) इतिहास:-
वाघेरा हे गाव सती घाटाच्या तोंडावर आहे.या सत्ती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याची निर्मिती झाली असावी. आकाशात घुसलेला वाघेरा किल्ल्याचा उत्तुंग उंचवटा आणि त्यावर फडकणारा हिंदवी स्वराज्याचा ध्वज आपले दुरवरूनच लक्ष वेधून घेतो.

६) किल्ल्यावर काय काय पाहणार?
राजविहिरवाडी पासून १० मिनिट चालल्यानंतर आपण पहिल्या पठारावर पोहचतो येथेच चापट मारुतीची मूर्ती आहे. पुढे थोडासा उंचवटा आणि पठार अशी वाट आहे. कातळकड्यातून वर चढण्यास पूर्वेला कातळकडयात कोरलेल्या पायऱ्या आहेत. कातळकडा चढल्या नंतर काही जुन्या वाडयांचे अवशेष आणि जोते पाहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावर उंच झेंडा आणि एक शिवलिंग , नंदी, विष्णूची मूर्ती आणि एक बिना धड असलेली दगडी मूर्ती आहे. ह्याच कातळकड्यात उत्तरेला पिण्याच्या पाण्याच कोरीव टाकं आहे.

★महत्वाची टीप:-
गडमाथ्याची वाट अतिशय निसरडी आहे, प्रॉपर ट्रेकिंग शूज घेऊन जाणे.

★काही छायाचित्रे:-
★पूर्ण माहितीपट Youtube वर अपलोड केलेला आहे.
नक्की पहा....

रामशेज किल्ला

नाशिकपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेला असा किल्ला “किल्ले रामशेज”.
जितका लहान हा किल्ला आहे, तितकाच मोठा आणि अभिमानास्पद असा इतिहास आहे ह्या किल्याचा...
देवी मंदिराच्या समोरचा पुरातन गणपती 

★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

१) पोहचणार कसे?
नाशिकपासून पश्चिमेकडे १५ किलोमीटर अंतरावर आहे किल्ले रामशेज. कुठल्याही खाजगी वाहनाने साधारण पाऊण तासात नाशिक पासून आशेवाडी (रामशेजच्या पायथ्याचे गाव) गाठता येतो.

२) भौगोलिकदृष्ट्या:-
उंची :- समुद्ररसपाटीपासून ९८५ मीटर 
श्रेणी:- सोप्पी
डोंगररांग:- नाशिक उपरांग (वायव्य)
 जाण्यासाठी उत्त्त्तम कालावधी:- जून ते मार्च

★किल्ल्याचा इतिहास:-
ह्या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू श्रीराम जेव्हा श्रीलंकेत जात होते त्यावेळेला इथे वास्तव्य केलं, थोडक्यात रामाची शैय्या म्हणून रामशेज म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर यााउरंगजेबाने जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इस १६८२ ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) नावाचे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.

संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनारावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ८०-९० तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात). या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.

पूर्ण माहितीकरिता वाचा हा ब्लॉग 

रामशेज हिंदी मध्ये

★काही छायाचित्रे:-

वैशिष्यपूर्ण दरवाजा

शिििलालेख

दरवाजा
रामशेज
महाराजांची मूर्ती
पाण्याचं टाकं

★किल्ल्यावर काय-काय पाहणार:-

किल्ल्यावर प्रवेश होण्याआधी उजव्या हाथाला एक गुहा लागते, ज्याचा पाणी साठवण्याव्यतिरिक्त पाहणी करता देखील वापर केला जायचा. याच गुहेत एक शिवलिंग देखील ठेवलेले आहे. थोडस पुढे चालून गेल्या नंतर आपल्याला प्रभू श्रीरामाचे मंदिर लागते याच मंदिराच्या पहिल्या भिंतीवर शिलालेख आहे आणि शेवटच्या भिंतीशेजारी पाण्याच टाकं आहे. इथे पाणी आपण पिऊ शकतो. या पुढे काही पाऊले चढून गेल्यानंतर आपण एक उद्धवस्त दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो.

गडमाथा म्हणजे एक प्रशस्त अस पठार आहे. दरवाज्याच्या समोरच एक महिरफ असलेला दरवाजा दिसेल त्यातून थोडं खाली उतरलो की एक खांब असलेलं टाकं बघायला मिळेल. प्रवेश दरवाज्याच्या उजव्या हाथाला एक उंचवटा आहे.आणि डाव्या बाजूला एक विस्तीर्ण पठार. याच बाजूला उंच असा ध्वजस्तंभ आहे, आणि 2 पाण्याच्या टाक्या आहेत. उजव्या बाजूला उंचवट्या कडे जाताना चुन्याचा घाणा दिसतो. ह्याच बाजूला एक देवीचं मंदिर आहे आणि ह्याच मंदिराच्या समोर गणपतीची पुरातन मूर्ती आहे. पुढे ५ पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, ह्याच बाजूला किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला पेठ हायवे कडे चोर दरवाजा आहे जो नक्की पहावा, किल्ल्याच्या पश्चिमेला पाण्याच्या अजून ५  टाक्या आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर highest point ला देखील पाण्याच्या 3 टाक्या आहेत आणि येथूनच पाणी खालच्या बाजूला जाण्याकरता वाट करून दिलेली दिसते..


★महत्वपुर्ण टीप:-

किल्ल्यावर जाताना पाण्याची सोय करून घ्यावी आणि स्वच्छता राखावी.


★किल्ल्याविषयीचा आपला व्हिडीओ

Monday, January 25, 2021

किल्ले रतनगड

नेहमी सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या फिरताना सवंगड्यांच्या तोंडून रतनगडाच कौतुक ऐकलं होतं. म्हणून ह्या वेळी थोडस ठरवूनच आणि मनाचा पक्का निर्धार करत रतनवाडी गाठलं. आणि रतनगडाच्या सौंदर्यात अक्षरशः हरवून गेलो.

★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

१) पोहचणार कसे?
रतनगड हा अहमदनगर जिल्ह्यात असून, नाशिक जिल्यातील घनचक्कर रांगेत येतो.
नाशिक पासूनचे अंतर १२० किलोमीटर आहे. पुण्यापासून 183 आणि मुंबई पासून 197 किलोमीटर आहे. रस्ता अतिशय खराब असून, प्रयत्न हाच असुद्या की तुम्ही कार ने ह्या ठिकाणी याल. ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी रतनवाडी नावाचे गाव आहे.

२) किल्ल्याची भौगोलिकदृष्ट्या माहिती:-
★उंची:- ४२५५फूट
★श्रेणी:- मध्यम
★ डोंगररांग:- कळसुबाई

३) किल्ल्याचा इतिहास:-
इ.स १३६० मध्ये महादेव कोळी नाईक
इ.स १४०० मध्ये जव्हारचे नेमशाह
इ.स १४९० मध्ये मलिक अहमद
इ.स १६३० मध्ये माहुलीच्या तहात मुघलांना देण्यात आला.
इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांच्या उत्तर मोहिमे अंतर्गत जिकण्यात आला
इ.स १६६४ मध्ये सुरतेवरून परतताना महाराजांनी येथे आश्रय घेतला.

४) किल्ल्यावर काय-काय पाहणार?
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीत अमृतेश्वर हे अतिशय सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे, त्याच्याच शेजारी पुष्करणी आहे. रतनवाडी पासून साधारणतः ३ तास चालल्या नंतर आपण किल्ल्यावर पोहचतो. वाटेत घनदाट जंगल , प्रवरा नदीच पात्र काही कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या आणि वनविभागाने तयार केलेले लोखंडी जिने लागतात, पहिल्या प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गणपती तयार केलेला आढळतो. पहिल्या प्रवेशद्वारातून आत मध्ये गेल्यानंतर दोन वाटा लागतात ह्यात लोखंडी जिना चढल्या नंतर उजवीकडची वाट गुहे कडे नेते आणि डावीकडे 
५) काही क्षणचित्रे
६) किल्ल्याचा संपूर्ण माहितीपट आपल्या youtube चॅनेल वर...

Saturday, January 23, 2021

किल्ले मार्कंडेय

नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगर रांगेत आपण आहोत, आणि सकाळीच रवळ्या-जवळ्या हे जोड किल्लेकरून मी आजच्या दिवसातील तिसरा किल्ला करावा ह्या हेतूने मी मार्कंड्या हा किल्ला करण्याचे ठरवले, आणि मुळाणे ह्या गावातून माघारी फिरत मार्कांड्या पायथ्याशी आलो.

★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

१) पोहचाल कसे?
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी ह्या गावी आपण प्रथम जावे आणि तेथून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबापूर नावाच्या गावी पोहचावे. ह्या गावालगत मुलनबारी नावाची खिंड आहे ह्या खिंडीतून मार्कंडेय पर्वताच्या पायऱ्या सुरू होतात.

२) किल्ल्याची उंची:-
समुद्र सपाटीपासून ४३८३ फूट उंच

३) किल्ल्याची श्रेणी:-
मध्यम स्वरूपातील

४) डोंगररांग:-
सातमाळ

५) इतिहास:-
अलीवर्दी खानाने इ.स. १६३९ मध्ये औरंगजेबाच्या आदेशाचे पालन करत नाशिक जिल्यातील ह्या डोंगररांगेतील सर्व किल्ले जिंकले ज्यांचा उल्लेख इंद्राई किल्ल्यावरील शिलालेखात आढळतो. ह्यात मार्कंड्या किल्ल्याचा देखील समावेश होतो. वणी-दिंडोरीच्या लढाईत शिवाजी महाराजांनी ह्या परिसरातील सर्व किल्ले जिंकून घेतले आणि नंतर १८१८ मध्ये हे किल्ले ब्रिटिशांनी ताब्यात घेतले.

६) किल्ल्यावर काय काय पाहणार?
वनविभागाने तयार केलेल्या पायऱ्या आणि काही लोखंडी जिने चढत आपण पहिल्या टप्प्यावर पोहचतो. हा टप्पा म्हणजे किल्ल्याची माची आहे. इथून पुढे कातळकडा लागतो, तिथे देखील रेलिंग बसवलेली आहे. कातळकड्यात पायऱ्या आहेत. थोडस चढून गेल्यावर आपल्याला डाव्या हाथाला २ गुंफा दिसतात, चौकोनी आकार आणि छोटासा enterance असलेल्या ह्या गुहा “ध्यान गुहा” म्हणून ओळखल्या जातात. येथून पुढे असलेल्या एका घळीतून आपल्याला सप्तशृंगी गड दिसू लागतो. पुढे अजून काही कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ह्या चढून आपण बालेकिल्ल्यावर पोहचतो.
इथे एक काळ्या दगडात गणपतिची मूर्ती ठेवलेली आहे. उजव्या हाथाला पाण्याच्या टाक्या आहेत ४, पुढे एक घुमटाखली पाण्याची टाकी आहे तिला कमंडलू तीर्थ म्हणतात. आणि आपण पोहचतो ते सर्वोच्च टोकावर इथे मार्कंड्या ऋषींचे मंदिर आहे.
सर्वोच्य टोकावरून आपल्याला सप्तश्रृंगी गड, मोहनदर, अहिवंत, धोडप , रवळ्या-जवळ्या ही किल्ले दिसतात.

★महत्वाची टीप :-
ह्या किल्ल्याला काही लोक सप्तश्रृंगी गडाकडून असलेल्या वाटेने येतात जी की खूप रिस्की आहे. त्यामुळे येताना नक्की मुलनबारी ह्या घळीकडून या, आणि पिण्याच्या पाण्याची सोय करूनच येणे.

★काही क्षणचित्रे:-
आपल्या मार्कांड्याच्या YOUTUBE व्हिडिओची लिंक:-


Monday, January 18, 2021

किल्ले रवळ्या-जवळ्या




आपण सध्या सातमाळ ह्या डोंगररांगेतील किल्ले करतोय. त्यात ह्याच डोंगररांगेतील रवळ्या-जवळ्या ह्या किल्ल्यावर मोहीम नुकतीच पार पडली. खरतर रवळ्या आणि जवळ्या हे दोघे किल्ले म्हणजे जुळे भाऊच मानावे लागतील कारण दोघेही एकाच पठारावर आहेत. नाशिकपासून साधारणतः ७०किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात मुळाणे ह्या गावातून ह्या किल्ल्याना जाणारी अशी अधिकृत आणि सहज वाट मिळते.

किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

★पोहचणार कसे:- 
नाशिकहून वणी- बाबापूर- मुळाणे हे गाव गाठावे. (एकूण अंतर ७०किलोमीटर)

★किल्ल्याची उंची:-
1) रवळ्या:- ४०५५ फूट
2) जवळ्या:- ४३६९ फूट

★किल्ल्यांची श्रेणी:-
मध्यम स्वरूपातील

★डोंगररांग :- सातमाळ

किल्ल्यांचा प्रकार :- गिरिदुर्ग

★स्थान:- मुळाणे,कळवण तालुका, नाशिक जिल्हा

★इतिहास
ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये “रोला-जोला” असा उल्लेख आढळतो.१६७० मध्ये शिवाजी महाराजांकडे हा किल्ला होता. १८१८ मध्ये हे किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि १८१९ मध्ये जवळ्या किल्ल्याच्या पायऱ्या आणि तटबंदी तोफा लावून उध्वस्त करण्यात आल्या.

★ किल्ल्यावर काय-काय पाहणार?

१)रवळ्या किल्ल्यावर:-


रवळ्याच्या कातळकड्या खाली अपूर्ण अवस्थेत सोडुन दिलेल्या काही गुहा आहेत.  कातळकड्या खालीच एक सुप्त स्वरूपात पाण्याचं टाक आहे.  कातळकडा चढताना थोड्या-फार पायऱ्या लागतात ज्यांची अवस्था इतकी काही छान नाही. काही पायऱ्या चढल्यावर एक दरवाजा लागतो, ज्याच्या उजव्या बाजूला एक शिलालेख आहे.  दरवाजा आणि त्या मध्ये असणारा तीव्र चढ आपल्याला खूप मजेदार अनुभव देतो. दरवाजा चढल्यावर डाव्या हाताला गुहा आहेत, पाण्याचं टाक आहे. किल्ला म्हणजे विस्तीर्ण पठार आहे. वर पाण्याच्या टाक्या आहेत, घोड्याच्या पागा आहेत. किल्ल्यावरून धोडप, इखारा, कण्हेरगड, कंचना, इंद्राई हे किल्ले दिसतात. 

२) जवळ्या किल्ल्यावर

हा किल्ला चढताना सुरवातीलाच उजव्या हाताला एक गुहा आहे आणि मुख्य आकर्षण म्हणजे एक घळीतून वाट निघत “चिमणी क्लाइंम्ब” करावं लागतं, फार मज्जा आली इथेतर.. पुढे कडा चढण्याकर्ता दोर बांधलेला आहे सहजगत्या हा पॅच चढता येतो जर गिर्यारोहणाचा अनुभव असेल तर. गडमाथ्यावर काहीही अवशेष नाहीत. पाण्याच टाक मात्र नक्की पहायला मिळत ज्यात पिण्याजोग पाणी नाही.


★महत्वाची टीप
हे किल्ले मध्यम श्रेणीतील असले तर वाट आणि चढण अंगावर येणारी आहे. आणि घनदाट जंगल देखील आहे, ह्या व्यतिरिक्त खूप साऱ्या ढोरवाटा देखील आहेत. म्हणूनच कुणा तरी जाणकाराला अथवा वाटाड्याला सोबत नक्की घेऊन जा..


★आपल्या youtube व्हिडिओची लिंक:-

रांजणगिरी किल्ला

त्रंबकेश्वर डोंगररांग म्हणजे निसर्ग सौंदर्याचा निखळ झराच समजा की, इतके छान छान किल्ले आणि विलोभनीय दृश्याने भरलेला हा परिसर आपल्याला प्रेमात...